परतूर शहरामध्ये नगरपालिका निवडणूक जाहीर होताच प्रभागात सिमेंट रस्त्याचे काम जोरात सुरू आहे परंतु सदरील काम माती मिश्रित वाळू, कच व हलक्या दर्जाचे सिमेंट वापरल्याने प्रभागातील रस्ते उखळल्याचे तर अनेक ठिकाणी भेगा पडल्याचे प्रकार पहावयास मिळाले. शहरात होत असलेल्या कामाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड ओरड झाल्यानंतरही पालिकेने मात्र अडमुठे धोरण स्वीकारत खोदकाम न करता रस्त्यांचे काम सुरू ठेवलेले आहे. याबाबत काही नागरिकांनी जिल्हाधिकारी सह पालकमत्री राजेश टोपे, माजी मंत्री आ.लोणीकर, पालिका प्रशासक उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार यांना निवेदनाद्वारे तक्रारी केल्यानंतरही सदरील काम बोगस पद्धतीने करण्याचा सपाटा सुरू आहे.
पावसाचे पाणी इमारतीत घुसणार
------------------
प्रभागात अनेकांच्या जुने बांधकाम असलेल्या इमारती खोदकाम न करता रस्त्यावर रस्ता करीत असल्याने इमारती रस्त्याखाली जात असल्याने या इमारतीमध्ये पावसाळ्यात पाणी घुसण्याची शक्यता आहे गतवर्षीच नवीन रस्ते झालेल्या रस्त्या शेजारील घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरून लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे प्रकरण ताजे असताना पालिकेने यापासून धडा घेण्याऐवजी बेधडक कामे सुरु ठेवली आहे.
गट वेळेस जेथलिया यांनीच लोणीकर यांच्या रस्त्याच्या कामाला या कारणानेच विरोध केला होता, आज जेथलिया यांच्याच पालिकेत हा प्रकार चालू आहे यात सामान्य नागरिकांचे घर दुकाने पाण्यात जाणार आहेत.
या कामाच्या स्थळी परवानाधारक कंत्राटदार व अभियंता कुठेच दिसले नाहीत. अप्रशिक्षित कामगारांच्या मार्फत सदरील कामे करण्यात येत असल्यामुळे सदरील कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट होत आहे.
आदेशाची अवहेलना
--------------------------
याबाबत नागरिकांच्या तक्रारीचे अवलोकन करून तहसीलदार रूपा चित्रक यांनी मुख्याधिकारी यांना तात्काळ काम थांबवण्याचे आदेश दिल्यानंतरही आदेश झुगारून प्रभागातील कामे सुरु होते.
या बाबत मा.नगरविकास मंत्री सह विभागीय आयुक्त यांना या दर्जाहीन कामाच्या बाबतीत निवेदन देण्यात येणार असून झालेल्या सर्व कामाची उच्च स्तरावर चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.
