कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३५ लाख ९० हजार रुपये आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
परतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशांची कत्तलीच्या उद्देशाने अवैध वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची दखल घेत परतूर पोलिसांच्या पथकाने तात्काळ कारवाई केली. तपासणीदरम्यान अशोक लेलँड कंपनीच्या एमएच ०४ एलक्यू ८८०२ क्रमांकाच्या कंटेनरमधून २८ गोवंशांची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्व गोवंशांची सुटका करून कंटेनर ताब्यात घेतला.
या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०४२९/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३(५), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अटकेत; तपास सुरू
पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. सुटका करण्यात आलेले २८ गोवंश आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनर असा एकूण सुमारे ३५ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल रावते करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलीस अधिकारी आर. टी. रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, पोलीस उपनिरीक्षक अमोल रावते, पोलीस कॉन्स्टेबल खंदारे, जाधव (ब.क्र. १४१९), गीते, गोविंद पवार, ज्ञानेश्वर वाघ, परमेश्वर माने व नितीन बोन्डारे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
